भुसावळ – बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या खिशातून मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना गुरुवारी दि.१२ रोजी सायंकाळी घडली. या कारवाईत सुमारे ४२ हजार ४११ रुपये किमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश समाधान वराडे (वय ३१, रा. टाकळी खुर्द, ता. जामनेर) हे रेल्वेत ऑपरेटिंग विभागात नोकरीस असून ड्युटी संपवून सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता भुसावळ बसस्थानकात जामनेर बस पकडण्यासाठी आले होते.बसच्या दिशेने जात असताना एका तरुणाने त्यांच्या खिशातून मोटरोला कंपनीचा मोबाईल काढून पळ काढला.वराडे यांनी आरडाओरडा केल्यावर त्याच वेळी दुसऱ्या प्रवाशाचाही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले.नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून संशयिताला पकडले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
अंगझडतीत दोन मोबाईल हस्तगत…
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण ४२ हजार ४११ रुपये किमतीचे दोन मोबाईल आढळून आले. यात मोटरोला कंपनीचा २४,४११ रुपये किमतीचा मोबाईल हा फिर्यादी योगेश वराडे यांचा असल्याचे त्यांनी ओळख पटवली. तसेच १८ हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल हा साईल सूर्यभान गायकवाड (वय १९, रा. करंजी, ता. बोदवड) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
संशयिताची ओळख पटली पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव तन्वीर उर्फ तन्या अब्दुल रहीम शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव; सध्या मुक्काम शिवाजीनगर, भुसावळ) असे असून त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई…
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कांतीलाल केदारे, जावेद शहा, अमर अढाळे, दिलीप कोल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पंच म्हणून कलीम शेख व तेजस पाटील यांनी काम पाहिले. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांविषयी नागरिकांमध्ये सतर्कता वाढली असून पोलिसांनीही प्रवाशांनी आपली मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन केले आहे.




































