जयंती सोहळ्यानिमित्त दिंडीचे आणि शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, वीरकुंड येथील तुकडोजी महाराज चौक येथून भजनाच्या गजरामध्ये दिंडीला सुरुवात झाली होती..
पोलीस वार्ता, वणी : आज भगवान हनुमान जयंती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती निमित्त नवेगाव, वीरकुंड येथे आज दि.12 एप्रिल रोजी, सकाळी 7 वाजता दिंडीचे आणि शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वीरकुंड येथील तुकडोजी महाराज चौक येथून भजनाच्या गजरामध्ये दिंडीला सुरुवात झाली होती. दु.1 वाजता ह.भ.प आवारी महाराज यांचा काल्याच्या किर्तनचा कार्यक्रम संपन्न झाला.
या दिंडी सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी चांगलेच परिश्रम घेतले होते. वणी तालुक्यातील हरिपाठ, वेगाव, डोंगरगाव, सोमनाडा तसेच नवेगाव यासह अनेक गावांचा सहभाग व सहकार्य यासाठी मिळाले. या हनुमान जन्मोत्सव व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती सोहळ्यानिमित्त श्री.निलेश चवले यांनी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच अखिल भारतीय सेवा मंडळ, नवेगाव यांनी जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

कार्यक्रम प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे जयंती मंडळाने स्वागत केले. यावेळी बोलताना सौ.किरण ताई देरकर, वनी स्त्री-शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणाल्या, ज्यावेळी महिलांची प्रगती होईल तेव्हा राष्ट्राची प्रगती होईल, राष्ट्रसंतांची भजने, कीर्तने आपण म्हणावी त्याने आपल्यामध्ये त्यांच्या विचारांना वाव मिळेल आणि यातून आपल्या स्वतःची, गावाची, राष्ट्राची, समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम घेतले आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देत गावकऱ्यांना त्यांचे विचार सांगून सौ.किरण ताई देरकर यांची सर्वांचे मार्गदर्शन केले.






































