वणी शहरातील मालवाहू गाड्यांची जड-वाहतूक दिवसा बंद करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन वणी पोलीस उपनिरीक्षक सिता वाघमारे यांना देण्यात आले..

पोलीस वार्ता, यवतमाळ : तालुका असलेले वणी शहर दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रगती करत आहे. त्यामुळे कंपन्यांसाठी शहरात येणाऱ्या जाणाऱ्या मालवाहतूक वाहनाची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. वणी शहरातील प्रत्येक चौकाच्या ठिकाणी वाढलेले अतिक्रमण आणि निमुळ रस्त्ये यांमुळे सतत रहदारीला अडथळा ठरवून ट्राफिक जाम होत आहे. हि रोजची समस्या झाली असून नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नोकरी व कामावर जाणाऱ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही, शाळकरी विद्यार्थ्यांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यात इमर्जन्सीमध्ये ॲम्बुलन्स आणि रुग्णांचे हाल सांगायची गरजच नाही. असेच चालले तर कोणाच्या जीवावर बेतू शकते!

या त्रासाला कूठे तरी आळा घालून तो कमी व्हावा या दृष्टीने वणी शहरातील मालवाहू गाड्यांची जड-वाहतूक दिवसा बंद करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन वणी पोलीस उपनिरीक्षक सिता वाघमारे, वाहतूक उपविभाग वणी यांना देण्यात आले. शहरातील गांधी चौक मुख्य बाजारपेठ परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची रोज मोठी गर्दी असते. त्यातही बेशिस्त दुकानदार जाहिरात फलके रस्त्यावर आणून ठेवतात, गांधी चौक भागातील व्यापाऱ्यांकडे रोज येणारे मालट्रक आणि ते खाली होण्यासाठी लागणारा दिवसभराचा वेळ या दरम्यान बाजारपेठेत मालट्रकांमुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते.





































