नागरिकांनी घाबरून साठेबाजी टाळावी; चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जळगाव शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.
तथापि, काही ठिकाणी अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जादा इंधन खरेदी किंवा साठवणूक करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत :
सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये.
भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न टाळावा.
पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये.प्रशासन व संबंधित कंपन्यांवर विश्वास ठेवावा.अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. काही शंका असल्यास नागरिकांनी अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन धुगे यांनी नागरिकांना शांतता, संयम व सहकार्य राखण्याचे आवाहन केले असून कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खात्री बाळगण्यास सांगितले आहे.





































