संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन..

पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये दि.20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता तसेच यावेळी विजांचा कडकडाट, पाऊस, काही ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
हवामान अंदाजानुसार दि.19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात घाट परिसर, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. तर दि.20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून ज्यामुळे पुणे विभाग, मराठवाडा दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भात अमरावती विभाग यात देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. दि.22 तारखेला वादळी पावसाचे प्रमाण आणि त्याच्या तीव्रतेत घट होईल.
संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार यादरम्यान शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे सतर्कता बाळगावी.
-
शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत.
-
काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत.
-
वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
-
शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेली पीक उत्पादने उघड्यावर ठेवू नयेत.




























