सिद्धार्थ नगर ही मोठी कामगारांची वस्ती गेली 60 वर्षापासून येथे वास्तव्यास असून तिला एकलहरे ग्रामपंचायतीकडून कायमस्वरूपी करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात..

पोलीस वार्ता, नाशिक : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राने नाशिकसह राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. येथे निर्मित होणारी वीज ही शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व इतर जिल्ह्यात पोहोचवली जाते. या प्लांट मध्ये काम करून आपले कुटुंब चालवणारी मोठी लोकवस्ती केंद्राच्या स्थापनेपासून आजूबाजूच्या परिसरात उदयास आली आहे.
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र सुमारे 1970 पासून कार्यान्वित असून तेव्हा पासून कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या तीन पिढ्या या वस्त्यांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यातच एकलहरे मधील सिद्धार्थ नगर ही एक मोठी कामगारांची वस्ती गेली 60 वर्षापासून येथे असून ती वर्षानुवर्ष वाढत आहे. या वस्तीमध्ये आदिवासी, दलित, मुस्लिम व अन्य जाती धर्माचे लोक अनेक वर्षांपासून राहत असून त्यांत चांगला बंदुबाव आहे. येथील रहिवाशांची संख्या वाढत असून ग्रामपंचायती कडून लोकवस्तीत मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. सिद्धार्थ नगर लोकवस्ती आज ही कायमस्वरूपी झालेली नाही. तिला कायमस्वरूपी करण्यात यावी व त्यासंबंधी शासन दरबारी नोंद करून घ्यावी. यासाठी दि.26 जानेवारी भारतीय ‘प्रजासत्ताक दिनी’ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने स्थानिक रहिवाशांनी एकलहरे ग्रामपंचायत येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे.

गेल्या एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकी मतासाठी दिलेल्या आश्वासनाकडे विजयी ग्रामपंचायत सभासदांचे दुर्लक्ष झाले असून, आलेला लोकविकास निधी खर्चून चांगले रस्ते, नाल्यांची सफाई, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज व रस्त्यावर पथदिवे, वस्तीतील मुला मुलींसाठी चांगली शिक्षण व्यवस्था यांकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही माफक अपेक्षा ‘प्रजासत्ताक दिनी’ लोकवस्तीतील रहिवाशांची आहे.




























