पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही.. -आमदार मंगेश चव्हाण

पोलीस वार्ता, जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात पोलीसांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी दि.18 मे रोजी सायं 6 वाजता एका कॉम्प्युटर सेंटर चालवणाऱ्या व्यवसायकाच्या क्लासवर जाऊन त्याला धमकावून एका गुन्ह्यात तुला व तुझ्या भावाला अडकवू गुन्हा तुझ्या क्लासवर घडला आहे. अशी भीती त्याला देऊन नंतर त्याच गुन्ह्यातून त्यांची नावे कमी करण्यासाठी त्याला तडजोडीचा मार्ग दाखवत तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. असा गंभीर आरोप चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तडजोडीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी 1,20,000/- रुपये व्यवसायिकाकडून स्वीकारल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे. तशी चाळीसगाव पोलीस ठाण्यात संबंधित व्यावसायिकाने फिर्याद देखील दिली आहे.

खंडणी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आमदार चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. संबंधित तरुण व्यावसायिकाने आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, आमदार चव्हाणांनी तात्काळ चाळीसगाव पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसमोरच आमदारांनी तक्रारदार तरुण व्यावसायिकाला बोलत केले. व्यावसायिकाने घडलेला प्रकार सांगून पैश्याची मागणी केल्याची सांगीतले. सर्व ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनीही याबाबत संपूर्ण चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता, त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, असा पवित्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी प्रश्न विचारला, पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही?





































